Saturday, July 24, 2010

बाभळीचा वाद!

(सुवर्णकण)
आंध्र प्रदेश 1975 सालचा करार मोडत आहे!
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर बाभळी बंधारा बांधला जात आहे. हा बंधारा बांधण्याचे काम त्वरीत थांबवावे यासाठी आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत आहे हे स्पष्टच आहे. गोदावरी नदीवर जर बाभळी बंधारा बांधला तर आंध्रच्या तेलंगणा भागातील किमान सहा जिल्ह्यांना पाणी मिळणार नाही. यामुळे आधीच दुष्काळात ओढलेले हे जिल्हे पाण्याअभावी उद्ध्वस्त होतील, असा आंध्रचा दावा आहे. याच तेलंगणा भागात येत्या दहा दिवसांत स्थानिक निवडणुका आहेत. या निवडणुकांवर नजर ठेवून आंदोलन सुरू झाले आहे.
1975 साली आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात पाणीवाटपाचा करार झाला. या करारानुसारच गोदावरी नदीवर बाभळी बंधारा बांधला जात आहे. या बंधाऱ्याची क्षमता केवळ पावणेतीन टीएमसी पाण्याची असल्याचे महाराष्ट्र शासनाचे म्हणणे आहे. येथील 58 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 26 एप्रिल 2007 रोजी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्या. के.जी. बालकृष्णन्, न्या. आर. व्ही रवींद्रन आणि न्या. डी. के. जैन यांच्या खंडपीठाने हा बंधारा बांधण्यास महाराष्ट्राला परवानगी दिली. फक्त पाणी सोडण्यासाठी बंधाऱ्यावर गेट बांधू नये अशी अट घातली. सर्वोच्च न्यायालयाने बंधारा बांधण्यास परवानगी दिल्यानंतरही आंध्र प्रदेशातून या धरणाला सतत विरोध होत आहे.
आंध्र प्रदेशचे म्हणणे आहे की, गोदावरी नदीवर महाराष्ट्राने 13 लहान मोठे प्रकल्प बांधले तर आंध्र प्रदेशला पाणीच मिळणार नाही. आंध्र प्रदेशच्या श्री राम संग्राम योजनेला अर्थच उरणार नाही. तेलंगणा भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पोचंबड धरणात पाणी भरणारच नाही. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय एस. आर. रेड्डी यांनीही या बंधाऱ्याला विरोध केला होता. हा बंधारा बांधण्यास महाराष्ट्राला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पक्षाच्या लोकसभेतील चार खासदारांनी संसदेत धुमाकूळ घालून अधिवेशन बंद पाडले होते.
आंध्र प्रदेशचे म्हणणे आहे की, दोन्ही राज्यांत झालेल्या करारानुसार महाराष्ट्राला फक्त 65 टीएमसी पाणी उचलण्यास परवानगी आहे. महाराष्ट्राने याआधीच दुधना (14 टीएमसी), मुजलगब (12.4 टीएमसी), मंजिरा (11.2 टीएमसी) आणि विष्णुपुरी (11.4 टीएमसी) अशा चार योजना करून महाराष्ट्राच्या वाटणीचे सर्व 65 टीएमसी पाणी उपसले आहे. त्यामुळे आता हा बंधारा बांधून आणखी पाणी घेता येणार नाही. बाभळी बंधारा बांधला तर आंध्रने गोदावरी नदीवर उभारलेल्या श्री रामसागर योजनेतही पाणी येणार नाही.
आंध्र प्रदेशचे हे आरोप असत्य आहेत, असे महाराष्ट्राचे वकील अन्धियार्जुना यांनी सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिले. यामुळे न्यायालयाने बंधारा बांधण्याची महाराष्ट्राला परवानगी दिली. तरीही स्वतःचे राजकीय हित जपण्यासाठी आंध्रचे राजकारणी याबाबत अजूनही आंदोलने करीत आहेत.

Saturday, July 10, 2010

जेसी ओवेन्स काळे तुफान

(सुवर्णकण)
द्वारकानाथ संझगिरी यांच्या "चॅम्पियन्स महान खेळाडूंची गौरवगाथा' या पुस्तकात क्रीडा विश्वातील विविध खेळातील चॅम्पियन्सची यशोगाथा त्यांनी रेखाटली आहे. त्यात 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिक्समध्ये जगातील सर्वाधिक वेगवान माणूस ठरणारा जे. सी. ऑपन्स याच्या बद्दलचा लेखसुद्धा द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिला आहे. त्याच लेखातील हा उतारा.
तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं! त्यानंतर तो तिथे फिरकलाच नाही. पण त्याच्या त्या पराक्रमाची पुण्याई एवढी मोठी होती की, त्यानंतर तो अजरामर झाला. ही कथा आहे जेसी क्लेव्हेलॅन्ड ओवेन्स नावाच्या खेळाडूची ऑलिम्पिकमध्ये शेकडो खेळाडू भाग घेत असतात. पण एखादा खेळाडू क्रीडा कौशल्याची एवढी उच्च पातळी गाठतो की तो संपूर्ण ऑलिम्पिक्स खाऊन टाकतो.
36 चं बर्लिन ऑलिम्पिक्स हे जेसी ओवेन्सच्या पायाशी निगडीत आहे. त्या ऑलिम्पिक्समध्ये त्याने चार सुवर्णपदकांवर आपला हक्क प्रस्थापपित केला. पण केवळ तेवढ्या भांडवलावर तो "दंतकथेत' जमा झाला नाही. जगातील लाखो लोकांच्या आणि विशेषः कृष्णवर्णियांच्या गळ्यातला तो ताईत बनला, त्याने हिटलरच्या वंशश्रेष्ठत्त्वाच्या तत्त्वज्ञानाच्या ठिकऱ्या उडवल्या म्हणून! ओवेन्स-हिटलर हे प्रकरण त्यावर्षी बरंच गाजलं. जर्मन आणि फक्त गोऱ्या त्वचेच्या खेळाडूंना त्याच्या खोलीत बोलावून त्यांच अभिनंदन करणाऱ्या जर्मनीच्या हुकुमशहाने जेसी ओवेन्सचे राकट काळे हात हातात घेणं शेवटपर्यंत कटाक्षाने टाळलं. जसा हिटलर तशी त्याच्या कब्जात असलेली वर्तमानपत्रं! नाझी वर्तमानपत्रे तर निग्रोचं "ब्लॅक आक्झीलियरी' असंच वर्णन करायची.
राज्यकर्त्यांची जरी ही तऱ्हा असली तरी आम जर्मन जनतेने जेसी ओवेन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. चाहत्यांचा आणि त्याच्या स्वाक्षरीसाठी धडपडणाऱ्यांचा त्याला इतका गराडा पडायला की सह्या करून त्याच्या हातांना त्रास होईल, म्हणून अमेरिकन टीम मॅनेजरने त्याला ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर पडू नकोस अशी विनंती केली. हुकुमशाहीच्या कोंदट वातावणरातही ओवेन्सचं महात्म्य वाढत गेलं.
विक्रमाची घाऊक मोडतोड
ओवेन्सने बर्लिनमध्ये पाय ठेवण्याअगोदर त्याच्या असामान्य क्रीडानिपुणतेची झलक दाखवलेली होती किंबहुना सात जागतिक विक्रमांचे तुरे डोक्यावर मिरवतच तो बर्लिनमध्ये अवतरला. 25 मे 1935 रोजी हमशीनगनमधल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत, घड्याळाचे काटे दुपारी सव्वातीनवरून चारपर्यंत पोहचायच्या आत त्याने सहा जागतिक विक्रम इतिहासजमा करून टाकले होते. मुख्य म्हणजे त्या ऐतिहासिक दिवशी ओवेन्स पाठदुखीने त्रस्त झाला होता. तो शंभर यार्डाच्या धावण्याच्या शर्यतीसाठी उभा राहिला आणि पाठदुखीने त्रस्त झाला होता. तो शंभर यार्डाच्या धावण्याच्या शर्यतीसाठी उभा राहिला आणि पाठदुखी वगैरे सर्व विसरून त्याने ते अंतर 9.4 सेकंदांत पार केले. नंतर फक्त दहा मिनिटाने त्याने 8.13 मीटर्स लांब उडी मारली आणि तोही जागतिक विक्रम ओवेन्सच्या खिशाल अलगद जाऊन पडला. त्याने चक्क सहा इंचाने बाजी मारली होती. त्यानंतर जागतिक विक्रमांनासुद्धा ओवेन्सचा लळा लागला असावा. कारण काही मिनिटांतच 220 यार्डस, 200 मीटर्स हर्डल्स असे चार धावण्याचे जागतिक विक्रम ओवेन्सला जाऊन बिलगले. केवळ पंचेचाळीस मिनिटांत जेसी ओवेन्स सात जागतिक विक्रमांचा अधिपती झाला होता.
हे काळं तुफान असंच सहजतेने अंतिम फेरीपर्यंत सरकलं. दिनांक 3 ऑगस्टला अंतिम फेरीत पावसाने ओल्या झालेल्या ट्रॅकवर फ्रॅन्क व्हायकॉफ, रास्फ मेटकॉल्फ, रेनार्ट स्ट्रॅन्डबर्ग सारख्या मातब्बर धावपटूंना मागे सारत, जेसी ओवेन्सने 100 मीटर्सचं सुवर्णपदक एक लाख दहा हजार प्रेक्षकांच्या साक्षीने स्वतःच्या मालकीचं केलं. त्याने सर्व प्रेक्षकांना एवढं वेड लावलं होतं की, प्रेक्षकही मनाने ओवेन्सबरोबर धावत होते. तो जगातला सर्वात वेगवान मानव ठरला होता. ज्या नशिबवान डोळ्यांनी त्याला न्याहाळलं ते त्याच्या धावण्याच्या शैलीची तुलना एखाद्या सुंदर बॅले डान्सरशी करत होते. मुख्य म्हणजे ते ज्याला अत्यंत सहज जमत होतं. नैसर्गिक देणगी असल्याप्रमाणे कुठेही फार प्रयत्न ूकरावे लागतायत असा प्रकार नव्हता. 4 ऑगस्टचा दिवसही ओवेन्सच्याच नावावर लिहिला गेला होता. ओवेन्सने उंच उडीचं सुवर्णपदक त्या दिवशी जिंकलं. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची घटना तो दिवस अविस्मरणीय करून गेली. खऱ्याखुऱ्या ऑलिम्पिक स्पिरीटचा प्रत्यय त्या दिवशी आला. "लांब उडी' हे खरं तर जेसी ओवेन्सचं राखीव कुरण होतं. पण त्या दिवशी आश्चर्य घडलं. टेक ऑफ घेताना चूक झाल्यामुळे त्याच्या पहिल्या दोन्ही उड्या बाद ठरविण्यात आल्या. आता फक्त एकच संधी उरली होती. ती हुकली असती तर जगातील सर्वोत्कृष्ट लांब उडी मारणाऱ्या खेळाडूला सुवर्णपदक दूरच राहो, साधी अंतिम फेरीत भाग घ्यायचीसुद्धा संधी मिळाली नसती.
आलिम्पिक स्पिरीट
भांबावलेल्या ओवेन्सला काय चुकतंय हेच कळेना. ऐनवेळी "आर्यन' रक्ताच्या लॅक लॉंगने कानावर सतत पडणाऱ्या आर्यन श्रेष्ठत्वाच्या प्रचाराला बाजूला सारून "निग्रो' ओवेन्सला मदत केली. ती करत असताना स्वतःचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंग होणार हे त्याला स्पष्टपणे दिसत होतं. पण खिलाडू वृत्तीपुढे त्याला पदक तुच्छ वाटलं असावं. प्रत्येक वेळेला ओवेन्स ओव्हरस्टेपिंग करतोय, हे त्याने त्याच्या नजरेत आणलं. शेवटची उडी ओवेन्सने अत्यंत काळजीपूर्वक सहा इंच अलीकडून मारली तरीसुद्धा त्याने पंचवीस फूटांचं अंतर पार केलं.
त्यानंतर इतरांना खरं म्हणजे काहीच स्कोप नव्हता. जर्मनीच्या लॅक्स लॉंगने त्याला गाठायचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही. ओवेन्सने शेवटच्या फेरीत चक्क 26 फूट साडेपाच यार्ड लांब "हनुमान उडी' मारून अस्तित्वात असलेला विक्रम एका फुटाने तोडला. तो विक्रम 1960 च्या रोम ऑलिम्पिक्सपर्यंत अबाधित होता. बदलती तंत्र आणि वाढत्या तंत्रज्ञानाची मिळणारी मदत वगैरे मुळे ऑलिम्पिक्समधील विक्रम दीर्घकाळ टिकत नाहीत. तरीसुद्धा पुढे 24 वर्षे ओवेन्सच्या विक्रमाला जाऊन "भोज्या' करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
लांब उडीचा सोहळा आटोपल्यानंतर लॉंग आणि ओवेन्सने हातात हात घालून संपूर्ण मैदानाला फेरी मारली. मित्रत्वाचा किस्सा इथे संपला नाही. 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण करेपर्यंत दोघांचा पत्रव्यवहार चालू होता. दुर्दैवाने लॉंग युद्धात मारला गेला. परंतु युद्ध संपल्यावर ओवेन्सने त्याच्या मुलाशी पुन्हा नातं जुळवलं.
दोन दिवसांत दोन सुवर्णपदके? तीन दिवसांत तीन होणार का? हा प्रश्न ओठावर घेऊन दिनांक 5 ऑगस्टला हजारो क्रीडा रसिकांनी राईश स्पोर्टस् फिल्ड स्टेडियमवर गर्दी केली. 200 मीटर्सच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या शर्यती त्या दिवशी होत्या. जेसी ओवेन्सला तिसरं सुवर्णपदक मिळविताना पहाण्यासाठी त्यांचे डोळे आसुसलेले होते. एका उपांत्य फेरीत मॅट रॉबिन्सन ह्या दुसऱ्या अमेरिकन निग्रोने ओवेन्सच्या 21.1 सेकंदाच्या आलम्पिक रेकॉर्डची बरोबरी केली आणि ओवेन्सच्या पाठीराख्यांच्या छातीत धस्स झालं. चाणाक्षपणे फारसा दम न घालवता "ओवेन्सने दुसरी उपांत्य फेरी 21.3 सेकंदात जिंकली.
देशबांधवांची वागणूक
आठ जागतिक विक्रम आणि चार सुवर्णपदकांनी भरलेली बॅग घेऊन जेव्हा ओवेन्स मायदेशी परतला तेव्हा त्याला काय मिळालं? पुन्हा तीच तिरस्करणीय वागणूक, जी मानवतेची टिमकी वाजवणाऱ्या अमेरिकेत काळ्यांना मिळते. सुवर्णपदक आणि जागतिक विक्रम काही त्याच्या कातडीचा रंग बदलू शकत नव्हते. बर्लिनमध्ये तो जगज्जेता असेलही, पण अमेरिकेत तो साधा निग्रो होता. गोऱ्या वर्णापुढे अमेरिका पदकांना फारसं महत्त्व देत नव्हती. आज स्थिती थोडीफार सुधारली असली तरी, अजूनही निग्रोच्या जीवावर पदकं मिळवणाऱ्या अमेरिकेत त्यांना फारशी किंमत नाहीच. पुढे एकदा ओवेन्स दुःखाने म्हणाला, ""माझ्याशी हिटलरने हस्तांदोलन केलं नाही. त्याचं काही वाटलं नाही, परंतु आमच्या राष्ट्राध्यक्षांनीही व्हाईट हाऊसमध्ये बोलावून शाबासकी दिली नाही.'' स्वकीयांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे हताश झालेल्या ओवेन्सने "हौशी' खेळाला रामराम ठोकला आणि तो व्यावसायिक बनला. पैशासाठी तो घोड्यांबरोबर शर्यती धावू लागला. घोड्यांबरोबर माणसांनी धावणं हा विचारच मनाला चटका लावून जातो. पुढे त्याने रेडिओ आणि टेलिव्हिजनमध्येही काम केलं. काळ्या मुलांसाठी शिकागोमध्ये बोर्डिंगही बसवलं. ऑलिम्पिकपासून दूर झाला असला तरी शेवटपर्यंत त्याचा आॅलिम्पिकमधला इंटरेस्ट कायम होता. अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून अमेरिकेने मॉस्को आॅलिम्पिक पाहण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. विधात्याला त्याच्या जीवनाची शर्यत त्यापूर्वीच संपविण्याची दुर्बुद्धी झाली. जेसी ओवेन्स नाव धारण करणारं "काळं तुफान' आता इतिहासाच्या पानांत बंदिस्त झालंय. पण जेव्हा जेव्हा आॅलिम्पिक्सची ज्योत प्रज्वलीत होईल, तेव्हा या तुफानाची यादगार निघाल्याशिवाय राहणार नाही. "जेसी ओवेन्स' हे नाव पुसून टाकायचं सामर्थ्य काळातसुद्धा नाही.

Monday, July 5, 2010

आता पुढे काय?

(अग्रलेख 6.5.2010)
काल अभूतपूर्व असा शंभर टक्के यशस्वी "भारत बंद' झाला. भारताचे सर्व विरोधी पक्ष प्रथमच बंद पुकारण्यासाठी एकत्र आले आणि त्यांच्या या एकजुटीने कडकडीत बंद झाला. ही एकजूट आधी झाली असती तर पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅसची किंमत वाढविण्याचे धाडसच कॉंग्रेसच्या केंद्रिय सत्तेला झाले नसते. पण विरोधक पूर्ण निष्प्रभ झाल्याने कॉंग्रेस आघाडी सरकार बेपर्वाईने वागू लागले होते. जनतेची होणारी हालअपेष्टा आणि जनतेच्या मनात धगधगणारा संताप याची झळ आपल्यापर्यंत पोचणार नाही अशी खात्री झाल्याने केंद्र सरकार सुस्त पडून होते. गॅसची किंमत 35 रुपयांनी वाढविल्यावर पत्रकारांनी जाब विचारला तेव्हा उत्तर आले की, 35 रुपये ही फार मोठी वाढ नाही. दर दिवशी एक रुपयाच बाजूला ठेवायचा आहे. हे लोकशाहीतील सर्वात भयंकर उत्तर आहे!! केंद्र सरकार असे उत्तर देऊ शकते याला जितके सरकार जबाबदार आहे तितकाच विरोधी पक्ष जबाबदार आहे. विरोधी पक्ष नावाला उरल्यानेच अशी उत्तरे देण्याचे धाडस सत्ताधारी पक्ष करू शकतो.
"भारत बंद' विरोधी पक्षांनी एकत्र येऊन यशस्वी केला. पण पुढे काय? विरोधी पक्षांची एकजूट अशीच राहिली तरच केंद्र सरकारवर भाववाढ मागे घेण्याचा दबाव येईल. नाहीतर "भारत बंद' हा विरोधी पक्षांचा प्रसिद्धी स्टंट ठरेल. महाराष्ट्रात पुढील वर्षी पालिका निवडणुका आहेत. बिहार राज्यात चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तयारीत आहे. त्यामुळे बंद नंतर विरोधी पक्षांनी पुढे काहीच केले नाही तर हा बंद म्हणजे निवडणुकांची तयारी होती ही सामान्य माणसांच्या मनातील शंका रास्त ठरेल.
देशात जी स्थिती आहे तीच महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पूर्ण ढेपाळला आहे. आता महापालिका निवडणुका आल्याने विरोधी पक्षाला थोडी धुगधुगी येईल, पण मुळात तेलच नाही तर आग भडकेल कशी? महाराष्ट्रात मराठी भाषेचा गळा घोटला जात होता तेव्हा विरोध नव्हता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय फक्त अधिवेशनात बोंबाबोंब करण्यापुरता वापरला गेला. महाराष्ट्रात पाणी टंचाईच्या भीषण संकटाने शेतकऱ्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वच कासावीस होते तेव्हाही महाराष्ट्राच्या कोणत्याच रस्त्यावर विरोध दिसला नाही. "बेस्ट ऑफ फाईव्ह'चा घोळ झाल्यावरही विरोधाचे वादळ उठले नाही. जनतेला जगणे असह्य झाले तरी महाराष्ट्र थंड होता!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच निर्धास्त असतात. हायकमांड जे सांगेल आणि जसे सांगेल तसे अंमलात आणायचे इतकेच सरकारला ठाऊक आहे. अिलकडे फोनवर बोलतानाही वरून हायकमांडचा काय निरोप येतो हे जाणण्यासाठी मुख्यमंत्री मान वर करून आकाशाकडे बघत बोलतात.
हेडमास्तरचा हा पुत्र चुकून हेडमास्तर झाला. आपण सामान्यांच्या शाळेचे हेडमास्तर आहोत हे हेडमास्तर विसरला आहे. आयसीएसई किंवा सीबीएसई शाळेचे हेडमास्तर असल्यासारखे हा हेडमास्तर वागतो. या श्रीमंतांच्या शाळांची फी 40 हजार वरून 80 हजार केली तरी कुजबूज करण्यापलिकडे पालक काही करीत नाहीत. त्यामुळे हेडमास्तरला काही वाटत नाही. पण मुख्यमंत्री हे पालिकेच्या शाळेचे हेडमास्तर आहेत. सिलेंडरची 35 रुपये वाढ असह्य असणाऱ्यांचे हेडमास्तर आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नांदेडच्या शाळेत झालेल्या कडकडीत बंदने त्यांना जागे केले आहे. तेव्हा मुख्यमंत्री आता तरी चष्मा नाकावर अर्धवट न ठेवता पूर्ण वर ठेवा. म्हणजे संपूर्ण "ग्लोबल व्ह्यू' मिळेल.