Monday, August 16, 2010

खड्ड्यातील करोडपती

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी मुंबईपासून ठाण्याच्या रस्त्यांची स्थिती आहे. सामान्य माणूस खड्ड्यांनी त्रस्त आहे. गाडीवाले संतप्त आहेत. पण किमान 25 जण या खड्ड्यांमुळे सुखी आहेत. कारण दरवर्षी तेच तेच खड्डे बुजवून हे सर्वजण करोडपति झाले आहेत. खड्ड्यांतही भ्रष्टाचार सुरू आहे! बिनदिक्कतपणे आणि राजरोस भ्रष्टाचार होत आहे. कनिष्ठांपासून दोन टक्क्यांनी सुरूवात होते आणि अगदी स्थानिक उपद्रवापासून सर्वांना मिळून 20 टक्के वाटले जातात. उर्वरित 80 टक्क्यांत 30 टक्क्यांचे काम होते आणि 50 टक्के थेट कंत्राटदाराच्या घशात जातात. खोटी बिले, वाढीव दर सर्वकाही होते. खड्डा बुजविणे हा प्रकार भ्रष्टाचारात पूर्ण आकंठ बुडाला आहे. सर्वच धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे. भ्रष्टाचाराचे प्रकार पुढेे वाचाल तेव्हा थक्क होऊन वासलेला तुमचा जबडा बंद होणार नाही.
परप्रांतिय कंत्राटदारांची रिंग
बृहन्मुंबई महापालिकेत खड्डे बुजविण्याचे कंत्राट सातत्याने मूठभर कंत्राटदारांनाच दिले जाते. यातील एखादा सोडला तर सर्व कंत्राटदार परप्रांतिय आहेत. या कंत्राटदारांनी रिंग म्हणजे कंपू बनविला आहे. एका माणसाच्या वेगवेगळ्या नावाने कंपन्या आहेत आणि या नवनवीन नावाच्या कंपन्यांना बरोबर कंत्राटे मिळतात. बाहेरच्याला येऊच दिले जात नाही.
एखादा मराठी कंत्राटदार प्रयत्न करू लागला तरी यशस्वी होत नाही. कारण पालिकेनेच त्यासाठी बंदोबस्त केला आहे. मराठी माणसाला एखाद्या रस्त्याचे काम घेणे झेपू शकते. कारण त्यासाठी लागणारी ठेव आणि इसारा रक्कम भरायची असते ती त्याच्या आवाक्यात असते. पण पालिका अशा तऱ्हेने कामे विभागून देत नाही. एकदम पाच रस्त्यांचे काम घ्यावे लागते. म्हणजे त्यासाठी सुरक्षा ठेव मोठी आणि इसारा रक्कम मोठी असते. इतके पैसे कुठून आणणार? मराठी माणूस माघार घेतो आणि परप्रांतीय मेवा खातो. पालिका असे नियम करून मराठी माणसांना डावलते आणि मग मराठी माणसे पुढे येत नाहीत, अशी बोंब मारायला मोकळे.
मराठी माणसे चाकर बनविली
दुर्दैव असे की, खड्डे बुजविण्याचे काम ज्या 25 कंत्राटदारांच्या रिंगणात फिरते त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व मराठीच आहेत. पैसा परप्रांतीयांचा असतो. त्यांच्यासाठी मराठी माणसे राबत आहेत. कागदपत्रे तयार करण्यापासून खड्डे बुजविण्याची सर्व कामे परप्रांतियांच्या हाताखालची मराठी माणसेच करतात. केवळ साम, दाम, दंड, भेद वापरून निर्लज्ज भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून मराठी माणसाला एकही कंत्राट मिळत नाही.
2008-09 साली खड्डे बुजवायला 25 कोटी 27 लाख 25 हजार रूपये खर्च झाले. तरी पुढील वर्षी खड्डे होतेच. 2009-10 साली पालिकेने 33 कोटी खर्च केले. तरी पुढील वर्षी खड्डे आहेत. आता तर 2010-11 वर्षासाठी पालिका खड्डे बुजविण्यावर 40 कोटी रुपये खर्च करणार आहे. हा काय प्रकार आहे? आपण दिवसभर कष्ट करून घाम गाळून पालिकेकडे कर भरतो आणि आपल्या घामाचे पैसे पालिका अशी खड्ड्यात घालणार? परप्रांतियांच्या घशात ओतणार? या भयंकर भ्रष्टाचाराचा एकेक प्रकार वाचताना तुमचे रक्त पेटलेच पाहिजे.
दरवर्षी खड्डे पडलेच पाहिजेत
2007 साली खड्डे बुजविण्याचे कार्बन कोअर नांवाचे नवीन तंत्रज्ञान आणले. पण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडणार नाही म्हणून कंत्राटदार लॉबीने या तंत्रज्ञानाला विरोध केला. 2008-09 साली मॅट्रीक्स हे दुसरे चांगले तंत्रज्ञान आणले तर त्यालाही विरोध झाला. 2009-10 साली जेट पॅचर मशीन आणण्याचा निर्णय झाला. योग्य दाब टाकून बिटूमेन व इतर पदार्थ वापरून व्यवस्थित खड्डे बुजविणारे उत्तम यंत्र आहे. पण ही मशीन आणण्यात फार मोठा धक्कादायक प्रकार केला गेला.
संपूर्ण मुंबई आणि पूर्व व पश्चिम उपनगर इतक्या विस्तारीत परिसरासाठी केवळ 3 मशीन घेतल्या. या मशीन जर्मनीच्या कंपनीकडून थेट विकत न घेता एका कंत्राटदाराच्या कंपनीमार्फत घेतल्या. जर्मनीच्या या मशीनची किंमत प्रत्येकी 50 लाख रुपये आहे. पालिकेने मे. स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत 72 लाख रुपये प्रत्येकी या दराने मशीने विकत घेतली! 22 लाख रुपये प्रत्येक मशीनमागे अधिक का लागले?
त्याहून भयानक प्रकार पुढे आहे. ही तीन जेट पॅचर मशीन घेतल्यानंतर वर्षभरातच तीनही मशीन मेन्टेनन्सला काढली. तीन मशीन प्रत्येकी 72 लाख रुपयाला विकत घेतली. त्याच्या मेन्टेनन्सवर खर्च किती? 68 कोटी रुपये!!
थक्क झालात ना? 68 कोटी रुपयांत आणखी किती नवीन मशीन आल्या असत्या त्याचा हिशेब करायला लागलात? आम्हाला आधी हा आकडाच चुकीचा वाटला. पण माहिती देणाऱ्याने दोनदोनदा ठामपणे सांगितले की, 68 कोटी रुपये मेन्टेनन्ससाठी पालिकेने दिलेही आहेत. आम्ही म्हटले, 68 लाख असतील. पण नाही! 68 कोटीच मेन्टेनन्सवर खर्च केले आहेत.
कमी रकमेच्या निविदांचा घोळ
खड्डे बुजविण्यात इतका भ्रष्टाचार तर रस्ते बांधणीत किती असेल याचा विचार करा. खड्डे बुजविण्यासाठी किती खर्च येईल, याचा अंदाज पालिका अभियंता काढतो. त्यांनी काढलेल्या अंदाजावरून निविदेची किमान रक्कम ठरते. पालिकेचा अभियंता रक्कम निश्चित करतो म्हणजे ती योग्यच असते. पण कंत्राटदार त्यापेक्षा कमी किंमतीत निविदा भरतात. या कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे काम कसे होऊ शकते हे न विचारता किमान रक्कमेपेक्षाही कमी रक्कमेची निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराला काम देतात. यासाठी कंत्राटदार संपूर्ण कामाच्या 20 टक्के रक्कम वाटतो. मग काही काळाने हाच कंत्राटदार वाढीव रक्कम दाखवित खर्चाचा सुधारित अंदाज (एस्टीमेट रिव्हाईज) भरतो. ही वाढीव रक्कम लगेच मंजूर होते. म्हणजे कंत्राटदाराला काहीच तोटा होत नाही.
त्यानंतर कंत्राटदाराची कमाई सुरू होते. कंत्राटदार आणि पालिकेतील भ्रष्टाचारी या कमाईला अऊ आयटम (म्हणजे वेड्यातील येडी) असे म्हणतात. रस्ता करायचा असेल तर तो मजबूत करायला चार थर टाकावे लागतात. कंत्राटदार चार थर टाकण्याऐवजी दोनच थर टाकतो. एकदा रस्ता झाला की, किती थर टाकले ते सांगता येत नाही. त्यामुळे दोन थर टाकायचे, चार थराचे बिल लावायचे आणि न टाकलेल्या दोन थराचे पैसे थेट खिशात घालायचे. असे हे चार थरांचे खोटे बिल देताना "ये एडी आयटम है' असे म्हणतात.
मनसेचे रस्ते व आस्थापना विभागाचे प्रमुख संघटक योगेश परुळेकर आणि सरचिटणीस गौरव वालावलकर यांनी माहिती अधिकाराखाली ही सर्व भयानक व्यूहरचना खणून काढली. पत्रकार कीर्तीकुमार शिंदे यांनी प्रकाश टाकला आणि आज पालिका कंत्राटदारांचे कारस्थान "नवाकाळ' वाचकांसमोर मांडत आहे. भ्रष्टाचाराच्या कीडीने सर्व पोखरले गेले आहे हेच धगधगते सत्य आहे.

1867 साली रखमाबाईचे काय झाले?

गंगाधर गाडगीळ लिखित "मन्वंतर'मधील हा अभूतपूर्व खटला

मुंबईत दादाजीविरुध्द रखमाबाई प्रकरण उभं राहिलं. 1867 साली जनार्दन पांडुरंग नावाचा मनुष्य मरण पावला. त्याला फक्त रखमा नावाची एक मुलगी होती. त्याची एकंदर स्थावर आणि जंगम मिळकत पंचवीस हजारांची होती. त्याच्यामागे त्याची विधवा बायको होती. तिनं मुंबईतले तेव्हाचे एक प्रसिध्द डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांच्या जातीत अशा पुनर्विवाहास बंदी नव्हती. पण त्यावेळच्या कायद्याप्रमाणे त्या बाईचा आपल्या पहिल्या नवऱ्याच्या मालमत्तेवरील अधिकार नष्ट झाला आणि जनार्दन पांडुरंगची सर्व मिळकत त्याची मुलगी रखमा हिच्या नावावर झाली.
या रखमाचं लग्न तिच्या तेराव्या वर्षी दादाजी नामक तरुणाशी झालं हा दादाजी डॉ. सखाराम अर्जुन यांचा जवळचा नातलग होता. तो घरचा गरीब होता आणि डॉ. सखाराम त्याला पोसत असत. त्याचं शिक्षणही बेताचं होतं आणि त्याला क्षयरोगाची भावना होती. पण त्यातून तो कसाबसा वाचला. पण पुढे हा दादाजी आणि डॉ. सखाराम यांचं पटेना.
रखमाबाई डॉ. सखाराम यांच्याकडेच आपल्या आईबरोबर राहत होती आणि फावल्या वेळात आर्य महिला समाजाची चिटणीस म्हणून काम करीत होती.
दादाजी असा सारखा प्रयत्न करीत होता की, रखमाबाईनं आपल्या घरी यावं आणि आपल्याबरोबर नांदावं. पण ती त्याच्याकडे जायला तयार नव्हती. इतक्यात डॉक्टर सखाराम अर्जुन वारले आणि दादाजीनं आपली बायको आपल्या ताब्यात मिळावी म्हणून हायकोर्टात 12 मार्च 1884 रोजी फिर्याद केली. तेव्हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला दादाजीच्या ताब्यात दिलं जाण्याचा संभव आहे हे रखमाबाईच्या ध्यानात आलं.
तेव्हा रखमाबाईनं मुंबईच्या इंग्रजी वृत्तपत्रांत एक पत्र प्रसिध्द करून आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे, असं आपलं दुःख जाहीर केलं. यात तिचा हेतू असा होता की, आपल्याला सुधारकांची सहानुभूती मिळावी आणि हायकोर्टावर वजन पडावं. आपण जबरदस्तीनं एका स्त्रीला तिच्या पतीबरोबर नांदायला लावत आहोत, ज्याच्याशी तिचा विवाह तिच्या संमतीशिवाय झाला, त्याच्याबरोबर पत्नी म्हणून नांदायला भाग पाडत आहोत, असं एकदा हायकोर्टाच्या ध्यानात आलं, की न्यायदान करताना असा अन्याय आपल्या हातून होऊ नये, असं न्यायमूर्तींना साहजिकच वाटेल, असा हेतू त्यामागे होता.
आणि हाच खटल्यात मुख्य मुद्दा होता. रखमाबाईनं दादाजीशी लग्न झालं होतं, ते काही तिच्या संमतीनं झालं नव्हतं आणि म्हणून न्यायदानाच्या नावाखाली न्यायालयात तिला सक्तीनं दादाजीची बायको म्हणून नांदायला भाग पाडू नयं.
या मुद्द्यावर हिंदू धर्मशास्त्रावर आधारलेल्या कायद्यात काहीच स्थान नव्हतं. पण न्यायबुध्दीला ते पटणारं नव्हतं. म्हणून न्यायमूर्ती पिन्हे यांनी 21 सप्टेंबर 1886 रोजी रखमाबाईच्या बाजूनं निकाल दिला.
या निकालावर दादाजीनं हायकोर्टात अपील केलं. तेव्हा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सार्जंट आणि न्यायमूर्ती वेले यांनी पिन्हेसाहेबांचा निकाल फिरवला. हायकोर्टाचं म्हणणं असं होतं की, कायदा नैतिकदृष्ट्या न्याय करणारा आहे की नाही हे जर कोर्ट ठरवू लागलं तर ते कायदेमंडळाची जागा घेईल आणि ते इष्ट होणार नाही. शिवाय या बाबतीत वेगवेगळ्या भूमिका घेणं अगदी शक्य आहे. म्हणजे एका कोर्टात एक न्याय मिळेल, तर दुसऱ्या कोर्टात वेगळाच निर्णय दिला जाण्याची शक्यता निर्माण होईल. न्यायदानात अनिश्चितता येईल. गोंधळ उडेल. तेव्हा न्याय काय आणि अन्याय काय, ते ठरविण्याची जबाबदारी आपल्या माथ्यावर न घेता कोर्टानं कायद्याची अंमलबजावणी हेच आपलं कार्य आहे, असं मानलं. आणि म्हणून हायकोर्टानं दादाजीचा त्याच्या बायकोवरील हक्क मान्य केला.
तेव्हा रखमाबाईनं जाहीर केलं, की मी नवऱ्याच्या घरी बायको म्हणून नांदायला जाणार नाही. त्यामुळे मला तुरुंगात जायला लागलं, तर तिथे जायला मी तयार आहे.
गोष्टी जाहीररित्या इतक्या थराल्या गेल्यावर एलफिन्स्टन कॉलेजचे प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी रखमाबाई डिफेन्स कमिटी स्थापन केली. त्यांना सुधारकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे हा खटला तसा राज्यकारभाराच्या दृष्टीनं महत्त्वाचा नसला, तरी विशेषच गाजला.
ह्या खटल्याच्या मुळाशी जो मूलभूत मुद्दा होता तो म्हणजे हिंदू स्त्रियांची स्थिती त्यांना स्वतःच्या जीवनाबाबतचे मूलभूत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाहीत, की त्यांना पुरुषांच्या गुलामगिरीत जगावं लागतं आहे?
या खटल्याची बातमी इंग्लंडमध्ये जाऊन पोहोचली. पुष्कळसं स्वातंत्र्य भोगणाऱ्या आणि अधिक स्वातंत्र्य व हक्क मिळावे म्हणून चळवळ करणाऱ्या इंग्लिश बायका हिंदू स्त्रियांविषयी सहानुभूती दाखवून रखमाबाई कशी आहे, त्याची विचारपूस करू लागल्या.
हायकोर्टानं दादाजीच्या बाजूनं जरी निकाल दिला, तरी ते प्रकरण पुढे लढवायला लागणारा पैसा त्या बापड्याकडे नव्हता म्हणून रखमाबाईचा ताबा मिळवणे किंवा तिला तुरुंगात पाठवण्याची कारवाई करणे त्याला शक्य झाले नाही.
रखमाबाईच्या बाजूनं त्याच्याशी सामोपचाराची बोलणी झाली. त्याला चरितार्थासाठी पैसे देण्यात आले आणि त्यानं आपला नवरेपणाचा हक्क बजावण्याचा आग्रह सोडून दिला. रखमाबाईंना कोर्टाचा हुकूम मोडल्याबद्दल त्या दिवशी कोर्ट उठेपर्यंत नाममात्र शिक्षा झाली. न्यायक्रियेच्या कचाट्यातून ती सुटली. पण नंतर तिच्या जातीनं तिच्यावर बहिष्कार टाकला.
पण तिला आधार देणारी मंडळीही पुष्कळ होती. त्यात प्रिन्सिपल वर्डस्वर्य होते. त्यांनी तिला सावरलं आणि नंतर ती पुढे डॉक्टरीच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेली. तिनं तिथे एम.डी.ची डिग्री मिळवली आणि परतून यशस्वीपणे डॉक्टरीचा व्यवसाय केला. वयाच्या एक्याण्णवाव्या वर्षी 1955 साली तिचं निधन झालं. तिनं जणू स्त्रीस्वातंत्र्याच्या मुंबई इलाख्यातील व भारतातील चळवळीचा पाया घातला.

Sunday, August 1, 2010

फिल्मी कलाकारांचे ऐका! आरोग्य राखा!

(सुवर्णकण)
रायमा सेन
रोज प्रथम सूर्यनमस्कार घालते. सूर्यनमस्कारामुळे रक्तभिसरण चांगले होते. सूर्यनमस्कार हा सर्वांगासाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे. सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी भाज्यांचा रस पिते. न्याहारीला गव्हाचा ब्रेड, फळांचा रस, अंड्याचा पिवळा बलक काढून केलेले आम्लेट असा परिपूर्ण आहार असतो. रोज तोच तोच व्यायाम केला तर कंटाळा येतो. त्यामुळे सतत व्यायाम बदलत राहा. ज्या गोष्टी आपल्याला खायला आवडत नाहीत त्या सर्वात शेवटी म्हणजे रात्रीच्या भोजनासाठी राखून ठेवा. फळ, कच्च्या पालेभाज्या हे रात्री घ्यावं. आरोग्य राखायचे म्हणजे अती व्यायाम करून शरीराला दुखापत करून घेणे नव्हे. आपल्या मर्यादा ओळखून व्यायाम करावा, हे महत्त्वाचे आहे.
कंगना राणावत
मी भरपूर पाणी पिते. दिवसांत 8 ग्लास पाणी प्यायल्याने माझी त्वचा तुकतुकीत राहते. मी व्यायाम करून आधीच शरीर कमावल्याने मला आता खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत. जीममध्ये मी आठवड्यातून फक्त काहीच दिवस जाते. मात्र रोज ध्यानधारणा आणि योग करणे मी चूकवत नाही. माझे शरीर उत्तम राहण्याचे कारण योग हेच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत रोजची किमान आठ तास झोप झालीच पाहिजे. झोप पूर्ण झाली नसेल तर प्रकृती चांगली राहूच शकत नाही.
इशा कोपीकर
शरीराचे आरोग्य राखण्यासाठी योग्य आहार आणि आवश्यक तितकी झोप या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी रोज कटाक्षाने आठ तासांची झोप घेते. ही झोप सलग नसली तरी अधूनमधून झोप काढायची. त्याचबरोबर रोज उठल्या उठल्या 1 लीटर पाणीही पिते. यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर फेकले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही भूकेले राहू नका. भूकेले राहण्यापेक्षा दर दोन तासांची थोडेथोडे खात राहायचे. चांगली न्याहारी, दुपारचे चांगले जेवण आणि रात्री अगदी हलके भोजन यामध्ये कधी एखादे फळ, कपभर चहा आणि मारी बिस्कीट किंवा सुकामेवा हे माझे रोजचे खाणे असते.
मंदिरा बेदी
मी गोड अजिबात खात नाही. विशेषतः चॉकलेट खात नाही. कारण चॉकलेटचा एक खास खायला गेले की अख्खे चॉकलेट खाल्ले जाते. कार्बोहायड्रेट किती घेता यावर नियंत्रण ठेवायला हवे. मात्र कार्बोहायड्रेटची ही गरज आहे हे लक्षात ठेवा. तीन दिवसांतून एकदा कार्बोहायड्रेट घ्यायला हवे. मी आठवड्यातील 5 दिवस रोज 40 मिनिटे व्यायाम करते. मी शाकाहारी असल्याने शरीरात प्रोटीन कमी जाते. यासाठी अंड्याचा पांढरा भाग आम्लेट करून खावा. त्याचबरोबर मोड आलेली कडधान्ये आणि सोयाचेही सेवन करावे. कोणत्याही परिस्थितीत भूकेले राहू नये. ठरलेल्या अंतराने थोडे थोडे अन्न पोटात गेले पाहिजे. यामध्ये जर भूक लागली तर एखादे बिस्कीट, सॅण्डविच व फळ खाणे उत्तम.
रोनित रॉय :
मी कधीही अती खात नाही आणि घरचे अन्नच खातो. मी शाकाहारी आहे. माझ्या भोजनात विविध धान्यांचा समावेश अधिक असतो. बाजरीची भाकरी आवश्यक असते. गहू आणि तांदूळ मी अजिबात खात नाही. मी ब्रेड, बिस्किट, समोसाही कधी खात नाही. नित्यनियमाने रोज 1 तास धावण्याचा व्यायाम करतो.
राहूल देव
आपले वय वाढत जाते तसतशी आपली श्वसनाची शक्ती कमी होते. यासाठी नेहमी दीर्घ श्वास घेऊन सोडणे महत्त्वाचे असते. याची स्वतःला सवय करून घ्यावी लागते. रोज ठराविक लीटर पाणी पिणे महत्त्वाचे नसून दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रोजचा 40 मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. त्यासाठी जीमलाच जाणे गरजेचे नाही. चालणे, धावणे, पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळणे यापैकी कुठलाही व्यायाम केला तरी चालेल. दिवसभर 5 ते 6 वेळा थोडेथोडे खावे. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही आवश्यक आहे. प्रोटीनने स्नायू तयार होतात आणि कार्ब्रोहायड्रेट मेंदूसाठी आवश्यक असते.